Farmer Death News in Marathi
Crop Loss Issue: राज्यात सुरू असणाऱ्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, बॅंकांचे कर्ज आणि सावकारांच्या जाचामुळे (Farmer Death News) बार्शी तालुक्यातील कारी येथील शेतकरी शरद गंभीर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या अकरा वर्षांच्या मुलीने मांडलेली व्यथा मनाला चटका लावणारी आहे. पुढे वाचा सविस्तर.
लेटेस्ट अपडेट साठी बीड न्यूज ग्रुप जॉइन करा
Dharashiv News Today Marathi

Dharashiv News: माझ्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी धाराशिवला घेऊन जायलेलं. पण मीच नको म्हणलेलं. मी पैसं आल्यावर जाऊ म्हणलेलं. त्यांच्याकडं पैसंच नव्हतं. कर्ज काढून सगळं पैसं शेतात घातलं. ते संपलं म्हणून खासगी सावकारांकडून पैसं घेतलं. ते पण शेतात गेलं अन् शेतातील पीक पाण्यात गेलं. त्यांना सारखं फोन यायचं. आमच्या गळ्यात पडून रडायचं, पण काहीच सांगत नव्हतं, अशी मन हेलावून टाकणारी व्यथा कारी (ता. बार्शी) येथील आत्महत्या केलेल्या शरद गंभीर यांची अकरा वर्षांची मुलगी श्वेता हिने मांडली.
अस्मानी संकटाने गंभीर कुटुंबीयांचे सर्वस्व हिरावून घेतले आहे. शरद यांनी शेतात पेरलेल्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. ज्या डोळ्यांनी बागायती शेतीतून समृद्धी मिळविण्याची स्वप्ने पाहिली, त्याच डोळ्यांनी अतिवृष्टीने काळ्या आईवर कोसळलेले आभाळ अन् त्यामुळे ओढवलेले कर्जफेडीचे संकट पाहिले. पीक नुकसानीच्या संकटाशी दोन हात करण्याची धमकही बाळगली, पण बॅंकांचे कर्ज अन् सावकारांच्या जाचाचे चक्रव्यूह कसे भेदायचे, हे मात्र कळले नाही. अन् कुटुंब उघड्यावर सोडून शरद यांना मृत्यूला कवटाळावे लागले. Farmer Death News
लयमोठं कर्ज हाय म्हणून पप्पा सारखे रडायचे. काहीच सांगत नव्हतं. त्यादिवशी सकाळी हसत-हसत शेतात गेलतं. तू पोलिस होऊन दाखव, चांगलं राहा, असं सारखं म्हणायचं. मी पोलिस व्हाव, असं त्यांना वाटायचं. त्यांची लय आठवण येते.
– श्वेता गंभीर, शरद यांची मुलगी
शरद गंभीर (वय ४०) यांनी बुधवारी (ता. २४) सकाळी शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. गंभीर यांचे लहान बंधू श्रीकांत गंभीर यांनी त्यांच्या कुटुंबावर ओढवलेल्या संकटाची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘निम्मी बागायती अन् निम्मी जिरायती अशी एकूण सहा एकर शेती. थोरला भाऊ शरद हाच शेती बघायचा. शेतात तीन बोअर घेतले. दोन फेल गेले. एक थोडे चालते. त्यावर भागत नाही म्हणून आयडीएफसी बॅंकेकडून ६ लाख ८० हजार रुपये कर्ज घेऊन सोनेगाव तलावातून शेतात पाच किमी लांब पाइपलाइन आणली.
त्यानंतर बॅंक ऑफ इंडियाकडून अडीच लाख रुपये कर्ज घेऊन ड्रीप केली. साडेआठ लाखांचे कर्ज काढून ट्रॅक्टर घेतले. त्याचे तीनच हप्ते गेले आहेत. शेतात ऊस लावला. पण मागील वर्षी संभाव्य पाणीटंचामुळे शासनाने तळ्याचे पाणी बंद केले. त्यामुळे ऊस गेला. याशिवाय अडीच एकर लिंबू बाग, दीड एकर पेरूची बाग लावली. यंदा उर्वरित क्षेत्रात कांदा लागवड करण्यासाठी रोप टाकले.
उसाला उधारीवर ३० हजार रुपयांचा खताचा डोस टाकला. अन् दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाली. त्यामुळे लिंबू बागेत गुडघाभर पाणी साठले. लिंबं गळाली, सडली. पेरू बागेतही चांगला माल लागला होता. त्याला फोम लावायचे होते. पण ते घेण्यासाठी त्याला कोणाकडूनच पैसे मिळाले नाहीत. पेरू बागेचे नुकसान झाले. माल खराब झाला. त्यामुळे आता कर्ज कसे फेडायचे, या चिंतेने त्याने बुधवारी सकाळी गळफास घेतला,’’ असे सांगताना श्रीकांत यांना हुंदका आवरता आला नाही. Farmer Death News

कुटुंब प्रमुखच गमावल्याने कुटुंबीयांवर संकट
गंभीर कुटुंबात शरद हे कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत होते. त्यांच्या पश्चात आता कुटुंबात आई-वडील, पत्नी, एक ११ वर्षांची मुलगी, पाच वर्षांचा मुलगा, लहान भाऊ, भावजय असा परिवार आहे. श्रीकांत कळंब (जि. धाराशिव) येथे मामाच्या बॅटरीच्या दुकानात कामाला आहेत. त्यांचे नुकतेच लग्न झालेले आहे. शरद यांच्या जाण्याने आता कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे. Farmer Death News
कारी गावात सुमारे ४ हजार हेक्टर क्षेत्र आहे. द्राक्ष बागांसाठी आमचे गाव प्रसिद्ध आहे. साधारण ६०० एकर द्राक्ष बागा आहेत. बाकी पेरू बागा, ऊस, कांदा ही पिके आहेत. सर्वात जास्त क्षेत्रावर सोयाबीन आहे. अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने या पिकांचे ८० टक्के नुकसान झाले आहे. अजूनही शेकडो एकर पिके पाण्याखाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.
– खासेराव विधाते, उपसरपंच, कारी, ता. बार्शी, जि. सोलापूर.
ही बातमी वाचा :
धन्यवाद!







